सोमवार, २९ डिसेंबर, २००८

नव्या वर्षाचे स्वागत


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना नव वर्ष सुखाचे आणि समृध्दीचे जावो.
------------------------------------
नव्या वर्षाचे स्वागत, ओल धरते पापणी.
नवा आनंदही आहे, संगे जुन्या आठवणी.

विश्व परिस बाहूंचे दिसे विनविते चला.
जावू धावून रे करू नव्या स्नेहाची बोहणी.

उडे पाखराची जात, तिला नवे काय त्यात.
नव्या आकाशासाठीच चला करुया मागणी.

नव्या नव्याची हाउस, मान्य राहे नऊ दिस.
जुने वर्खण्याला मागू नव्या चैतन्याचे पाणी.

झाले गंगेला मिळाले, वृथा शोक काय त्याचा?
उभा राहुया रांगेत, नव्या प्रश्नांची वाटणी.

नव्या वर्षाचे स्वागत, नव्या स्वप्नांची वेचणी
नव्या उत्साहाने करू, नव्याध्येयाची आखणी.

--भूराम.

रविवार, २८ डिसेंबर, २००८

पिवळाई

वा-याच्या सुरात
मिसळणारी पाने
हिरवाईच्या आशेने
छेडत नवतराणे
स्वर्णझरा
देवून धरा
भोव-यात
गळते
ती सारी
जिवंत
पिवळाई.

--भूराम

शब्दांची वारी -एक जुना प्रयत्न


ही कविता १०-११ वर्षापूर्वी केलेली. पूर्ण नाहिय आणि एकसंध ही नाहिय. मन म्हणाल चला पोष्ट करूया.
--------***----------
शब्द उभारी, शब्द भरारी,
शब्द शिवारी, शब्दांची वारी.

शब्दच कमान, शब्दच बाण,
शब्दच शब्दांचा घेई प्राण.

शब्द चपल, शब्द विकल,
शब्दच शब्दांना सावरतील.

शब्दच सुख, शब्दच दुःख,
शब्दच शब्दांची सावरती भुक.

शब्दच भय, शब्दच लय,
शब्द्च शब्दांची बदलती सवय.

शब्द पुलकित, शब्द सिंचीत,
शब्दच लिहतील शब्दांचे गीत.

शब्दच प्रेम, शब्दच द्वेष,
सदा बदलते शब्दांचे वेश.
--------***----------

शब्द आई, शब्द बाबा,
ओला होतो -ह्रदय गाभा.

शब्द ताई, शब्द भाऊ,
वाटून घेतो प्रत्येक खाऊ.

शब्द सखा, जिवलगा,
एक प्रेमाचा कोवळा धागा.

शब्द नाती, शब्द गोती,
शब्दाविण पुरे न होती.

--------***----------
शब्द पॄथ्वी, शब्द सुर्य,
एक ममता, दूसरे विर्य.

शब्द चंद्र, शब्द तारे,
दुःखातील आशेचे वारे.

शब्द महंत, शब्दात संत,
शब्दच उजळे सारे दिगंत.

शब्द ज्ञान, शब्द जाण,
शब्दाविण हले न पान.
--------***----------

शब्द हात, शब्द लाथ,
असह्य एकच शब्दाघात.

.....अपूर्ण...

--भूराम

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २००८

एका नगास


college ला असतांना एका मित्राच्या फ़ालतू comments वर आलेला राग मी असा व्यक्त केला होता.

गळ्यात माळून घे तू, हे सुर्य, चंद्र,तारे.
सारे काही एकच तुझ्यासाठी मुर्खारे.

हसू नकोस राज्या,... हा विनोद नाही काही.
तुझा रुबाब तो कसला, जो तुलाच वाटतो शाही.


तू जगाचा नामी अव्वल अप्पलपोटी,
कृतीत लंगडा घोडा, सदाच "मी-मी" ओठी.

तुझे दगडाचे मन, न त्याला कसला पाझर.
कुठेही टाकतो पिचक्या, सदाच आपली वरवर.

अजब तुझा तो ढंग, अजब तुझे ते रंग.
ह्या अजब दुनिये मधला अजब असे तु व्यंग

कशी रे झेलते तुला, आमची विशाल छाती,
जेही जसे तू देशील ते तसेच येईल हाती.

आहे मान्य विकण्याला येथे ओरडावेच लागते.
तरीही ह्या जिभेला पाहून उचलावे लागते.

हाताची पाचही बोटे नसतात कधीच सारखी
एकच चुकीचा शब्द माणसं होतात पारखी.

ह्या दुनियेकडे तू बघ, सावरून मनातील ढग.
तुलाच नकोसे होतील तुझ्या सारखेच नग.

--भूराम...

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

भाऊबीज

"माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून"

परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

पोपटपंची सारेच करती भुलू नको कुणास,
राजपिंडा तो राजकुमार तुझा एकच खास.
डोळ्यांमधली स्वप्ने तुझी सारी साकाराया,
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

देवू नकोस लक्ष त्यांकडे ते सारेच चिवचिवती,
गरुडासारखी झेप तुझी म्हणून सारे जळती.
विंध्य, मग येईल हिमालय तरी न तू थांबाया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

संकट, दुःखे अनेक येतील तुझ्या वाटेस
गुलाब तोडू जाशील तेव्हा टोचतील काटेच
सक्षम तू आहेस तरीही ढळू न दे काया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

नसेल शरीरे पण मने सदा असेल सोबत,
पूढे चाल तो वाट पाहतो महाद्वारी ऐरावत.
समृध्दीची अथांग गंगा पायी लोळण घ्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

--भूराम

रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

स्मृती सावल्या.



नाहीत सावल्यांचे मी घर केले बंद,
आत्ताच सुर्य होता क्षितीजावरी मंद.
जरी रात्र येईल गिळण्या सावल्यांना
सांगून ठेवलेय विजेच्या त्या दिव्यांना.

समोर वास्तवाची चालेल वाट काळी,
स्मृती दाटून येता जाईल दिव्याखाली.
जवळता सावली छोटी, दुरता लांब होती.
अंतरे स्मरेल मजला प्रत्येक घडीचा साथी.

ह्या इथेच तो भेटला, इथे जवळचा झाला.
इथेच कोण कसा तो क्षणात रे दुरावला.
इथेच कुस मायेची कुणाची रे मिळाली.
इथेच कुणाला माझी नको होती सावली.

हो इथे सारी आली माझ्या पाऊलाखाली
इथेच हासू झालो मी कुणाच्या गाली.
इथे मी हळवा झालो अन इथे बोलका झालो.
इथेच सौदर्य मनातील कसा ओतता झालो!

इथे दिशेचे भान कसे मला मिळाले,
इथेच कुणाशी छान जुळवून घेता आले.
इथेच सावली काही थरथरलीही होती,
इथेच कशी ती गर्द मोहरलीही होती!

अशीच बदलून अंतरे दिव्यापासून माझी
मोजत राहील उंची स्मृती सावल्यांची.
उगाच मांडून गणिते चुका अन क्षमांची
पुढेच चाललो वाट स्वप्न, ध्येय-दिशांची.

--भूराम.

रविवार, १९ ऑक्टोबर, २००८

प्रवास


शब्द तो अनुरागे
देहातील ही परिभाषा
रे गंध, निळासा जोगी
चल नव्या खुणवती देशा.

तू पहा फ़ुलांचे वेग,
की गर्द मनाशी चाळा
आवेश बांधता भोगी
चैतन्याच्या ज्वाळा.

ह्या रणरणत्या चाहूली
ती अशी मोहीनी होते
ते रंग रंग तुटलेले
क्षितीजावर ओतूनी जाते.

घे प्राण तुझे नी माझे
आता भरोसा नाही.
ह्या पूढल्या वाटेवरती
कुठलाच आडोसा नाही.

-भूराम...
१०/१९/०८

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २००८

!!!हे रुपार्या!!!


(एका मित्राच्या slambook मधे कधिकाळी ही कविता लिहली होती.)

सामर्थ्ये झळाळी तुची एक रुपार्या,
किती दुखः साहे, तुझी शांत चर्या.
परीस गंध माती, तव स्पर्शे ज्योती,
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.

कळी देह लाही, प्रेम सुक्ते न्हाई,
तुझी कंठ विणा दिडदिडते मनाही.
स्वभावे कस्तुरी, चहूदिशेला दरळ,
अखिल ब्रम्हांडा झणी पाडशी भुरळ.
नवनिशांचे चांदणे तवं ओलस हासणे,
क्षणे लख्ख व्हावे मम काळोखात जीणे.
तूची व्हावी चालना मम जीवीत कार्या.
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.

काहीच कळेना तुझ कोणती वेदना,
नील चक्षू किनारी का गुलाली खुणा?
का गिळते हुंदके, तुझे तुच एकाकी?
मज सदा हे छळते, जरी मी अनोळखी.
मी गुजतो मनाशी, गुढ दिठीच्या व्रणाशी
देवून टाक मला , जेही दुःख तुज अशी.
माझा हात पुढे, तुझा तू कराया.
अहाहा! म्हणे मी अशी मिळो भार्या.


--भूराम...

शनिवार, २० सप्टेंबर, २००८

नाहीत मनाला दारे

नाहीत मनाला दारे
आकाश नितळ सोन्याचा
वाटेत प्रकाशी होता
सुरनाद नव्या गाण्याचा

नाहीत मनाला दारे
चालण्यात गुंतले पाऊल
पंखात बळ ते माझेच
क्षितीजात उगवती चाहूल

नाहीत मनाला दारे
जळण्यात कोणता अर्थ
प्रखरता माझीच सांगे
जळण्यातले सामर्थ्य

नाहीत मनाला दारे
आभास चांदणी होतो
शोधता सभोवी काही
मनास कोरूनी जातो

नाहीत मनाला दारे
सुखाचा क्षणैक पाऊस
भीजणेच अनोखे होते
फ़िटते पूरी न हौस

नाहीत मनाला दारे
काढण्या विटा-चुनारे
आणु शोधून कोठून
तोडूनी ह्या मौनारे.

--भूराम...

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

घे आंमत्रण...!



देहाभोवती अलंघ्य बंधन

तोड मुला, तुज खुले हे अंगण.

अंगणात या एक जांभळी,

बहर तिला रे असे उन्हाळी.

दूर दिसे ते पळस वाकडे,

पूष्प प्रभेची तिला हरकडे,

हिरवे पाते, भ्रमरे गीते,

रंग, कुंचले, फ़ुलवी प्रीते.

वर दिसे ते निळे आकाश,

समोर तो रस्ता, तोडू पाश,

तुला जे यौवन, अम्रुत जीवन,

खळाळ झ-याचा हळवा उन्मन.

तिर नदीचा नसे तो दूर,

तीथेच गवसेल तुजला सूर.

गीत आर्जवी इवल्या खगाचे,

अजून नच कळॆ तुजला त्याचे.

कशास बघतो अवती भींती,

इथे रे तुजला कसली शांती,

घे आंमत्रण खिडकीतून वारा,

निसर्ग तुला खुणावतोय सारा.


--भूराम.

१/२/२००१

मला वाटते... माझ्याचसाठी.


ह्या हलक्या फ़ुलक्या कवितेत मी माझ्या कालेज जिवनातील एक प्रसंग मांडलाय...

संध्याकाळी,...
दररोज...
बसतो गच्चीवर,
गॅलरीत...तूही येते,
मला वाटते... माझ्याचसाठी.

पाहता मी
तुझ्याकडे...
मधेच...
फ़ेकून नजर
मजवर...
तूही देते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

चालू असतो असाच खेळ
अंग मोडणे...,
केसं उडणे...
ओढ्णीला ते मधेच छेडणे.
मीही डोळ्यांनी टिपीत रहातो
अस्वस्थ मनाला तुझे वेढणे.
मग संध्या हळूच सरते...
मी उतरतो...
तू ही फ़िरते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

खोलीतून मग मी पाहू लागतो...
दिवा पेटतो..
खिडकीत...
ओझरती...
तूही दिसते...
मला वाटते... माझ्याचसाठी.

---भूराम...२१/०७/२००१

रविवार, १४ सप्टेंबर, २००८

उभारी


उडणा-यांनो आकाशात या
घ्या मनाची स्वैर भरारी.
जगणा-यांनो बंधने तुमची
बंधनात घ्या सदैव प्यारी.

रोष जगाचा होतो आहे,
होत असेल तर होवू दे आता.
भीती जगाची कोण उराशी,
उर असेल तर लिहुया गाथा.

उगवतीचे रंग विखुरते,
विखुरतेय पहा तेज असेच.
अंधाराचेही राज्य सरते,
सरेल आपले दुःख तसेच.

पेटवू या आत्म स्वयेच,
स्वयेच कळेल वाट पूढेच.
चालणार-यांना भय ते कसले,
कसले आता थांबणे नसेच.

चैत्यंन्याची ही अलोट गंगा
’गंगे’ सुर गुंजू दे शिवारी
चहुकडे अहा! आपुलेच राज्य
राज्यात ह्या नवी उभारी...


--भूराम
२८/११/२००१

तो वेडा की मी वेडा?


मळकटलेल्या रस्त्यावरती
मळकटलेली काठी घेवून
मळकटलेल्या अंगावरती
मळकी-फ़ाटकी कपडे लेवून
मळकटलेल्या पायांनी या
चालत होता अनवाणी...
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चिले पिले अवती भवती
कलकल कलकल करीत होती
हसत खिदळत दगडे मारून
घाव अंगावर कोरीत होती
तो बिचारा काठी हातची
भिरकावे मधेच वैतागूनी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चेहरी आणून भाव बोलतो,
"करेल जादू टोणा मी,
उंदीर बनवून एकेकास
भरेल माझा गोणा मी".
घाबरती का? बच्चे आजची!
असल्या युक्ती नसे जुमानी.
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

शिव्या ओठी, डोळ्यात लाली
ओरडला तो आदळून काठी
क्षणात पांगूळली इथे तिथे,
जेव्हढी झाली होती दाटी
बदलू लागली वाट आपुली
येती जाती माणसं शहाणी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

कोप-यात बसला चोरून अंग
सावलीत काही थरथर होता
माणूसकीच्या ह्या जगावर
कुठला ’साप’ सरसर होता?
डोळ्यात मग आभाळ गोठले
आसवात सारी घळली गाणी.
"तो वेडा की मी वेडा ?"
हळूच सुर घुमला कानी...!

-भूराम
१३/७/२००१

बुधवार, १० सप्टेंबर, २००८

माझ्या काही चारोळ्या...

प्रयत्न असतं, जगणं असतं.
आभाळकडे बघणं असतं.
पून्हा काही नविन निर्माव
हेच पावसाला मागणं असतं.

*****************

आभाळ पून्हा तेच सांगतं
जगणं मात्र विसरू नको.
पावसाच्या थेंबा थेंबात
भिजणं मात्र विसरू नको.

*****************

सगळं सगळं करावसं वाटतं
सगळं करतांना मीच विखुरतो
पून्हा एका जागी एकत्र येतानां
आयुष्य मात्र हरवतो.

*****************
आपल्या भेटची शेवटची आठवण
अजून मला आठवत होती
दूर जातांनाची तुझी आसवं
अजून डोळ्यात दाटत होती.

******************
मी आयुष्याचा जन्म मुठीत घेवून.
मृत्युच्या दारात भरकटत होतो.
ज्याला आयुष्य ही नाही, मृत्युही नाही.
त्या अश्वत्थाम्याला शोधत होतो.

******************
अंधार हा चहुकडे आधीपासुनच असतो.
प्रकाश मात्र निर्माण करावा लागतो.
प्रकाश निर्मिणारयाला लोक सुर्य म्हणतात.
आणि चंद्राला फ़क्त आंधळे प्रेमीच बघतात.

---भूराम

...रास...

पियुषाचा पाऊस सभोती
धुंद धुंद ती नाचे रती
पाठीवरती केस मोकळे
स्तनात ऋतूरस पाझरती.

नयनात लवलव चंचलता
ओष्ठात द्रवली स्फ़ुलिंगता
लाजलाजरी, साज साजरी
नटली वेलून पूष्पलता.

पैंजणाची झुणझुण झुणझुण
कर्ण कुंडले मिणमिण मिणमिण
कुणी न आता येथे सभोवती
कुणास शोधे अधून मधून

आला द्रुत तो पवन मदन
झाली उन्मन शहारले तन
धुंद स्पंदने ते आलिंगन
पाहण्या लवले तरू नी गगन

वर्णू कसा मी बंध तयांचा
स्पंदू कसा मी स्पंद तयांचा
अपूरे माझे शब्द सांगण्या
आवेग कसा त्या दो उरांचा

रास रंगला असाच किती...
मी थांबलो तेथेच कीती!
येवून सांज कवेत माझ्या
चल घरला म्हणे सोबती.

--भूराम
२२/१२/२००१

रविवार, ७ सप्टेंबर, २००८

मीच मृत्युंजय आहे...


अनेक लक्ष, अनेक ध्येय आहे
इथे थांबणे आता व्यय आहे.
’पुढे चालणे’ कर्म हेच जन्मभर
मिळाले जेही मानूनी स्नेह आहे.

आता लक्षू दे मला तोच डोळा
जिथे अर्जूनाने रोवला बाण वेडा
आता लक्षू दे पून्हा ते श्वान मुख
ज्या एकलव्ये केले क्षणे मुक.
रिंगणे उतरू दे होवूनी मज कर्ण
अर्जुना जळू दे पाहूनी माझा वर्ण
असे संकटे खेळू दे भीष्म युध्द
मग कृष्ण हाता भाग घेणे आयुध.
या संर्घषगीता ऐक कैशी लय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

जेव्हा शकुनी हात खेळती धुर्तचाल
पणा लावीतो युधिष्ठीरी जेष्ठ्भाल
द्रोणा शीर कटे ऐकता मुर्ख थाप
जेव्हा सत्य-मिथ्या मोजता एक माप.
जेव्हा जयद्रथा अर्जून येई सामोरा
तेव्हा काय तो ग्रहणी हो सुर्य तारा.
जेव्हा वाढतो अर्जुना कर्ण-धाक
तेव्हा काय रुते धरी ते कर्ण चाक.
ऐशा नियतीची मजला सवय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

अजुनी द्रोपदी नग्न होते सभेत
अजूनी एक कुंती पोर देते नदीत
अजूनी द्रोणपूत्र दूध पितो पिठाचे
गुरुस एकलव्य रक्त देतो बोटाचे
अजूनी रोज कुब्जा आसवी वाहे प्रश्न
अजूनी शापग्रस्त रोज होतोय कृष्ण.
स्व-अस्तित्व शोधे अजूनी रोज कर्ण
अन्याये सवियीचे झाले ध्रुतराष्ट्री मौन
अशा जगतातील एक मी, होय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

निराशेस मारक रक्त आहे ह्या देहात
कितिही अभिमन्यू ठार होवू दे व्युहात
कितिही रोज इंद्र उभे राहू दे दारात
असे दानविराची वैभवी माझी जात
मीच गंगापूत्र, मीच तो पंडूपूत्र
होय दुर्योधनाचा मीच आहे मित्र
मीच आहे तो, इतिहास भारताचा
मीच शिल्पकार आहे तो उद्याचा
मी तरुण, मीच मृत्युंजय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

--भूराम...
१७/०६/२००२

सोमवार, १ सप्टेंबर, २००८

आज जगावे

दुःख आतचे असेच द्यावे, रक्त कालचे ओकून.
आज जगावे घडण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

मी मनाशी सदैव म्हणतो, किती विषारी हा वारा.
जगणे अधिकच दुष्कर होते, श्वास ठेवता कोंडून.

टाळू म्हणता, येत्या घडिला,
गमावून कितीक बसतो...
जगु म्हणता, तिच घडी ती,
ओरबाळून मनी जळतो...

असेच घडते दुःख आतचे, आतच दबले कुजले जर
दर्प विषारी गिळून टाकतो, आज उद्याला कोळून.

म्हणून म्हणतो टाक सख्या रे, रक्त कालचे ओकून
आज घडावे जगण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

-भूराम...

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २००८

वेचतो निखारे...


शोधून काय आणू,
शब्दातली निराशा
आयुष्य पाहतो मी
नी वेचतो निखारे.

हां कोण तो उराशी
बांधून ठेवलेला...?
हृदयात चांदण्यांचे
आवेश बंद सारे.!

किरणांस स्पर्श झाले
देहातले निराळे.
संवेद मोजतांना
मी मागतो मलारे.

काहुर दाटलेले
पाऊल वाटवेडे.
मी पाहे ज्या दिशेला
माझेच प्रश्न सारे...!
...
माझेच प्रश्न सारे...?
श्वासात गर्द वारे...!
आयुष्य पाहतो मी
नी वेचतो निखारे...

--भूराम

रविवार, १७ ऑगस्ट, २००८

इथे तिथे नदी


इथे तिथे नदी

निळ्या आभाळाची होती

माझ्या पावुलात तिची

झुळते ग प्रिती


कोण छेडते कुणाला

आत भिडते मनाला

देह बांधला किनारा

हळवी ती नाती.


इथे तिथे नदी

ओल्या दिवसांची होती

थेंब टपोरया हातांनी

भिजवीते माती.


कोण रुजते कुणात

श्वास भरतो उरात

गंध सभोवात आता

दरवळे किती!


इथे तिथे नदी

माझ्या मनातही होती

खोल तळात रे तिच्या

आठवांचे मोती.


कोण शोधतो कुणाला

लख्ख करतो क्षणाला

आली वळवाची सर

नक्षत्रात स्वाती.


--भुराम...

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २००८

पाढा--बे एक बे

वरह्यांड्यात बसून आई स्वतःच काम करत करत आपला अभ्यास घेते. आपण अभ्यास करत नाही म्हणून आईने bat-ball लपवून ठेवलीय. अंगनात सर्व मूल खेळतायेत. आणि मी ह्या सर्वात पाढा म्हणताना कसा भरकटत जातो आणि शेवटी आईच्या हातचा मार खातो. अस काहीस मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न ह्या कवितेत केलाय.

बे एक बे
बे दुणे चार ,...
टेनिसचा बॉल,
कुठे गेला यार?
तिथं होती बँट
कुठे झाली गुडुप
आई ती उठली
ऊचलल सूप.
सुपातले गहू
"सांस की बहु ?"
पाखड़ता गव्हाला
शिंकला तो बाळ्या.
बाळ्याच्या हातात
भोवरयाची दोरी.
सुटलेला भोवरा
भिरभिर करी.
ओरडला रव्या
खिदळली ठमी
बाजूच्या बाकावर
चाललीय रमी.
राजा की राणी,
किल्वर का बदाम,
बूढी काय भजते
"रावण का राम?"
हातातली काठी
वाकडी कंबर
चष्म्यातले डोळे
बघे खाली-वर.
वाजली ती घंटी
कोण आला दारी?
ब्रेडवाला मामू
"टोस्ट की खारी?"
शेजारची काकू
बोलावते त्याला
काकुची चिंगी
चिडवते मला.
"चिंगी रे चिंगी
वाजव तुझी पुंगी"
रडू आले तिला
च्यायची ढोंगी.
पाठित धपाटा
"बे त्रिक आईsss!"
"अभ्यास कर पिंट्या
नाही तर खर नाही!"...
बे चौक आठ
दुखत होती पाठ
बे पंचे दहा
बे सक बारा.....
...
..
बे दाहे विस
चिंगी होती खवीस...

-भूराम

शनिवार, ९ ऑगस्ट, २००८

वेडा क्षण...!


असे जे सधन
निळे चिंतामण
फूले बाहुलीतून
तुझे कोवळे मन

दिठीतली मीठी
गर्द आणि ओली,
खुले श्वास माझा
अन हसावे यौवन.

जरी मी आठवावे
तुझेच भास् व्हावे
तुझी ती स्पर्शमुद्रा
मनी केलीय जतन.

खुळे ते ओठ हलती,
फुलांत रंग भरती,
बघून मी तो थांबलो
थांबला तो वेडा क्षण...!

असा जो सधन ...वेडा क्षण!

--भूराम

मंगळवार, ५ ऑगस्ट, २००८

चांदोमा



चांदोमा चांदोमा इतके गोरे गोरे कसे
मला मात्र मित्र सारी पाहून पाहून हसे

आणून कोठून गोरा रंग माझ्याकडे नाही
म्हणून दररोज रात्री मी तुझ्याकडे पाही.

एक म्हणे जारे तुझ्या चांदोमालाच माग
दूसरा म्हणे अरे त्याच्या चहरयावरती डाग.

राग मला तेव्हा त्यांचा खुप खुप आला
काय करू शेवटी तू एकाच मामा मला.

पळालो मी आईकडे शिरलो तिच्या कुशीत
'लाडका ग कृष्ण माझा' बोलली डोळे पूशीत.

--भूराम

शनिवार, २ ऑगस्ट, २००८

मनाच वैभव!

एक व्यापक विश्व डोळ्यासमोर असत. मी ही जाणिवात जगत असतो. निराळच असत ते मनाच वैभव! जगायला लावणार्या त्या दिवसाच शैशव! क्षणभर स्वप्नात डोलून हळूच उठतो. टवकारून बघतो. काहीसे ओळखिचे बोल कानावर पडतात. कोण ती ? काय ते शब्द? मी थांबतो, थबकतो. ओलसर मनात अनेक वलय उठतात. घेवून जातात कोठेतरी एका तळघरात. कालकुट्ट , गर्द, धीर,गंभीर, निशब्द काळोख. स्वतःलाच स्वतःअचा भय वाटावा इतका!..
"कधी मी बंद ,कधी मी नित्य?
कधी चाहुलिंच अनोळखी सत्य,
तो अंधार की मी अंधार?
का आहे हे मानसी अपत्य?"
अरे हां मी कुठे स्पर्श केला? अनेक थैमान चालू झालेत, वट्वाघूळींसारखे अनेकात किन्चाळू लागलेत... विचारांचे कलह...! भय,..भीती...त्रागा...भूक...तहान... एक एक मोजू लागलो आणि क्षणार्धात एक रांगड़ वैभव मला लपेटून घेत ,आपल्या मिठीत गच्च ... आणि मला कुचकरू लागत. मी चिडतो ,ओरडतो ,तोडू पहातो अनपेक्षितपणे आलेली बंधने.. मला नको असतो त्याचा तो वासनी स्पर्श.. त्याच आवेगात एक चपराक ओढून देतो .. त्याच्या कानात उठलेले असतात लाल वळ... माझ्या मनावर! तो लाल रंग गर्द होवू लागाताच क्षणार्धात डोळे उघडतात ..लख्ख होत . डोळ्यांच्या बुबुळावर काळे ठिपके वाढू लागतात. सांगू लागतात, "मी काजळ, ते आत जळालेल्या वैभावाच. कामा येईल तुला डोळ्यात अंजन म्हणून घालायला". डोळ्याच्या किनारयावर थोडी घाण जमू लागते...
"राहू दे मला इथे न जायचे कुठे
मी चालतो जगात ज्या जन्मती प्रेते!
नभात रक्त दाटले
देहात रक्त आटले,
हाडत्या पिंजर्यात,
सर्वस्व माझे फाटले.
रोज पाठ,रोज शाळा,
कोकिळेचा क्रूर गळा!
जाणिवांच्या शंकराला
हाय! पुजती भूते?
राहू दे मला इथे न जायचे कुठे..."

ते काजळ अंजन म्हणून माझ्या डोळ्यात भरून गेल होत, बोटाने डोळ्याच्या किनारयावरचि घाण पुसून टाकतो. तो दिपवणारा प्रकाश आता सवयीचा झालेला असतो. मन शांत झालेल असत आणि ते भावनांचे थैमान पाचोळ्यासारखे शांतपणे जमीनीवर मुकाट पडलेले दिसतात. मी केविलवाण्या नजरेने वर आकाशात बघतो. आकाशातला सूर्य एका भल्या मोठ्या शुन्यासारखा दिसतो... ते मनातल वैभव जाणवेनास होत ,एक रिक्तपणा गदगदून येतो. आसव टचकन डोळ्यात येतात.. ती निघून गेली असते.. ते शब्द पुसून गेलेले असतात.. फ़क्त असत अवती भोवती सांडलेल, दुरवर पसरलेल एक व्यापक विश्व आणि त्यात मी शुन्यासाराखा...

"मी मनाच्या पायथ्याशी थांबलो, झगडलो,
अन मनाच्या वैभावाशी भिडताच उखडलो ,
सावूलयांच्या स्वप्न रात्री मोजता मलाच मी
बेरिजताच शुन्य झाली, पोळलो मी रडलो?"

--भूराम

शुक्रवार, १ ऑगस्ट, २००८

तीच तू ग चंडिणी


समस्त स्री जातीला सलाम करून...


अशीच भेद तू नभा, चांदण्यांशी ऊधळूनि,
चंद्र तो तुझा कधी न, तू जगाची यामिनी.
निश्चला तुला म्हणू की, मी म्हणू निर्मला
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..


व्यक्त हे आवाज आहे शक्तीचे ,भक्तीचे
साद तू अशी खड़ी दे, बीज व्हावे मुक्तीचे.
तू नाही मोहात आता,तू असे मोहिनी.
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..


मी असा देहात आलो,थांबलो,... थबकलो!
पाहुनी तुला तुझ्या त्या तेजपूंजे भबकलो!
भस्मती तुझ्यात येता, तीच तू ग यज्ञिनी.
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..

स्वैर फेक तू स्वतः, जाणूनी विमुक्त तू,
व्याप्त तू,सशक्त तू, तूच विश्व,विरक्त तू,
तू नसे आसक्त आता, तू असे स्वामिनी...
खेचूनी जी सूर्य आणे तीच तू ग चंडिणी..

---भूराम

गुरुवार, ३१ जुलै, २००८

तू मनीष

मनीष माझा एक बालपणीचा मित्र. त्याचा स्वभाव आणि माझा अनुभव ह्या कवितेत मांड्ण्याचा पुरेपुर प्रयत्न केलाय. मनीष यार मित्रा तूच वाच आणि सांग किती जमले ते...

तू मनीष ,व्यक्त वेश,
चांदणी तुझा तो देश,
चाहुली असंख्य आहे
यत्न सारे नसे तो क्लेष,

पाउले तुझ्या दमाने ,
शोधणारे चांदणे,
रोज चंद्र तुझ्या कृपेने
उगवणे लोपणे.

राहतो तू पाहतो तू
हासणे, ते खेळणे.
प्रेम हे रक्त तुझे
नसानसात वाहणे.

तू धुरा, सबल करा.
जाण ती तुझ्या उरा.
कष्टला तो भूतकाळ,
आज तो सूर्य धरा.

जिंकणे तू जिंकणे
हेच रे आता मनीष,
तू मनीष व्यक्त वेश,
चांदणी तुझा तो देश.

--भूराम.

गुरुवार, २४ जुलै, २००८

भोकरडोळे (एक बडबड कविता)




भोकरडोळे भोकरडोळे पाहतात काय
वाटीत ठेवलेली दूधाची साय...
भोकरडोळे गेले वाटीपाशी
चाटून गेली वाघाची मावशी.

भोकरडोळे भोकरडोळे चाललात कुठं?
पाठीला दफ्तर आणि पायात बूटं.
भोकरडोळे बसले पूटकन छान!
काढलं पुस्तक आणि घातली मान.

भरभर भोकरडोळे अभ्यास करी
सुटली शाळा आणि पळाले घरी.
फेकल दफ्तर, धुतले हातपाय
भोकरडोळ्यांचा आता program काय?

भोकरडोळ्यांचा Program:

भोकरडोळे आले
पाटावर बसले
वरण-भात पाहून
खुदकन हसले
लोणच्याची फोड़
झाली गुडुप
"आई द ... थोलं
वाल अदून तूप!"


--भूराम

बुधवार, २३ जुलै, २००८

मीच खरा अपराधी (एक विडंबन काव्य/ मुक्तगीत)

मुळ गीत:
"भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठला मीच खरा अपराधी "
गायक: अजित कडकडे.

सम्पूर्ण काल्पनिक ... कुण्या भक्ति विलीन ह्रदयास हे विडंबन काव्य/ मुक्तगीत न रुचाल्यास क्षमा करावी.

भक्ति वाचून मुक्तेच्या मी लागलो रे नादी,
मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

शारुखाचे 'कुछ कुछ' अनुभवं,
सल्लुदाचे काही आसवं,
picture पाहूनी सरले शैशव,
जडली काय व्याधी ...१

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

झाडामागे म्हटली गाणी,
घनमन फिरलो बैलावाणी,
खुप उधळिला मुक्ते मी money
उरला नाही निधी ...२

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

गेली मुक्ता ,झाले लगीन,
उरले मागे कुत्रे जीवन,
पुढे न रमले कोठेही मन,
तिच्या चिन्तने कधी ...३

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

भक्ति वाचून मुक्तेच्या मी लागलो रे नादी,
मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

--भूराम


सोमवार, २१ जुलै, २००८

गाथा

ग्रेसच्या कवितांना स्मरून ...

अर्थ निळे गहिरेही
मन माझे बहिरेही

चालतात शब्द जणू
विश्वाची कामधेनु

पावलात भास खुळे
काळजात श्वास जळे

देहताही सुन्न काही
जगण्यात यत्न नाही

त्या खुल्या स्वप्नांची
बोलणारया प्रश्नांची

मांडलेली ही गाथा
ठणके मी ही आता.

-भूराम

गुरुवार, १७ जुलै, २००८

वैभवी राजा


शब्द अजूनी स्मरतो हृदयास छेद देणारा.
अनेक आकातांचा भयनाद वेद होणारा.

शब्द अजूनी स्मरतो आकाश निळे जळणारे.
क्षितिजात तांबड्या ओळी, आणि सूर्य बुडणारे.

शब्द अजूनी स्मरतो धमन्यात रक्त उड़णारे,
मिळत्या सावली खाली आयुष्य स्वस्त होणारे.

शब्द अजूनी स्मरतो स्मरणार मला का नाही!
ओंठास तिच्या त्या चिरा दिसणार मला का नाही!

शब्द अजूनी स्मरतो जातांना पडलेले ऊन,
दोन पाउलानंतर चालली पुन्हा ती थांबून.

शब्द अजूनी स्मरतो संथ श्वास तो माझा,
राणी ज्याची ना कुणी, असा मी वैभवी राजा.

असा मी वैभवी राजा....

--भूराम

रविवार, १३ जुलै, २००८

स्वप्नाची वरात


काढू पाण्याच्या वाटेला
एका स्वप्नाची वरात.
जसा लागेल उतार
तसं जावूया वेगात.

आले रंग वेडे गावं,
करू संथ थोड़ी धावं.
थोडं घोटाळून तेथे ,
उमटवू रंगे नावं.

थोडं साचू खळग्यातं,
वेचू निळे ते आकाश.
कोण्या मासळीला घेउ
नवा मांडूया तो रास.

होता पावसाची भेट,
मग नाचावू बाहुली.
करू जल्लोष हर्षाचा,
द्वाड पोराच्या पावूली.

हीच स्वप्नाची वरात,
नेऊ सागरा पर्यंत
होवू विलये विशाल
समेटूया दुःख खंत.

--भूराम.

धुवून गेला


क्षणाचा मोह ,
आणि क्षणाचे प्रेम
बदामाच्या आकारात खोचलेलं
नेहमीचच, आपल तेच same!

दगड, भिंती, झाड़,...
"एक दूजे के लिए",
"क़यामत से क़यामत तक", म्हणत म्हणत
वाजवत जातात सगळ्यांचाच game!

आम्ही रसिक मात्र
वाचतो खर ...
तोंडात पान -गुटका असेलतर
करतो सुध्धा acclaim!

अशाच एका दगडा जवळ आलो
आणि हळहळून म्हणालो
"प्रेम कुणाच आणि बळी कुणाचा,
What a shame?"

तेव्हड्यात एक कुत्रा आला
केली टांग वर आणि
धुवून गेला
त्याच name, ...
तीच name,...
आणि थुंकणारयाचाही claim!


हां हां हां ...
--भूराम

शनिवार, १२ जुलै, २००८

आभाळग्रस्त


मी एक आभाळग्रस्त,
क्षणाक्षणात दाटून येतात ढग,
हलक्याच झुळूकीने सुरू होतो पावसाळा.
नदी, नाले आधीच तुडूंब भरलेले,
फ़क्त दिसतो
थेंब ...
थेंब ...
कोसळणारा.
मी एक आभाळग्रस्त,...

कधी मी विज कडाडतो,
कधी मी ढग गडाडतो,
कधी हसतो हलकेच,...
ढगांचा एक कोपरा उघडून!
कधी आताच रडतो...
चेहरयावर प्रकाश घेउन...
प्रकाश...
जो पाझरलेला असतो
भेगा-भेगातून...
उराच्या...!
...
...
मी एक आभाळग्रस्त...

--भूराम

प्रिय मित्रांस...


(दीपक आंधळे ह्या मित्रासाठी ही कविता त्याच्या slam-book मधे मी लिहली होती. )

यश भरील झोळीत तुझ्या आकाश चांदणे,
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.
मी भेटेल रे जेव्हा माझी वळवून वाट,
पाहील समर्थपणाने तुझे पुढे रे चालणे.

तुझे आकाशाचे ध्येय, तुझे गरुडाचे पंख,
दिशा दिशांना भेदेल तुझ्या विजयाचे शंख.
हर्षो-शंख नादे नच मला तू भूलणे...
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.

तुला जेही दुःख आहे,ठेव मनाच्या कुपीत.
सारं असह्य जर होता, शोध मला तू सादीत.
मग वेड्या ह्या मित्राला तुझ्या सोबतच येणे.
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.

--भूराम

गुरुवार, १० जुलै, २००८

हे वृक्ष कोणते?



माझ्या हॉस्टल च्या प्रांगणात एक झाड़ होतं.
त्याला गुलाबी इवल्या-इवल्या फुलांचा भर्गच्च बहर यायचा.
हां बहर आला की त्याची सारी पान गळून जायची .
त्याच झाडावर सुचलेली ही कविता.
त्या झाडाच नाव मला अजूनही माहित नाही.
तुम्हाला कोणाला नाव ठावूक असेल तर मला जरूर कळवा.
=======================


मज ना कळे हे वृक्ष कोणते?
गुलाभ्री अंगभर, निष्पर्ण नेणते.
वसंत नाही दूर, वर्खले आभाळ,
मंद हालचाली माझ्याशी बोलते.
स्वच्छ तो प्रकाश, लख्खले खुलास,
क्लिष्ट त्या डहाळी गुलाल झेलते.
मंद स्पंद माझे, छंद श्वास ताजा,
आनंद-खंत मूर्ती... रूप भासते.
मज ना कळे हे वृक्ष कोणते?...

-भूराम

मंगळवार, ८ जुलै, २००८

एक मी आणि ती नदी,... किनारा,

ही कविता माझ्या मनाच्या खुप जवळची आहे. कारण ती 'तापी' नदी ला संबोधून लिहली आहे. माझ गाव तापी नदीच्या काठावर, माझ बरचस बालपण ह्या नदीच्या खड़काळ पात्रात हुंदकळ्ण्यात गेलय. ही कविता मी graduation नंतर GATE preparation साठी पुण्यात असतांना लिहली होती. पूण्यातल्या संथ आणि शांतपणे वाहणारया नदीला बघून तापी नदीची फार आठ्वण व्हायची (अर्थात आताही कधी कधी होते) . तापी नदीचा तो रांगडा प्रवाह , ते खडकाळ पात्र मनात इतक बिम्बला गेलय की पुण्यातल्या त्या शांत, संथ आणि आत्ममग्न नदीवर चिडच यायची. असो आता थांबतो नाहीतर उगाच पुणेकरी मला ठोकून काढायचे ;). आता कवितेचा आस्वाद घ्या आणि मला कळु दया तुम्हाला काय वाटते ते.
****************************
एक मी आणि ती नदी,... किनारा,
अडे पाय माझा तिचा वेग न्यारा.
स्वभावे असा होतो कधी मी,
तिचा तो उधाण नित्याचा भाग सारा.

कशी मस्त खेळे मुक्त मासळी ती!
कशी स्वैर खगे उड्डाण घेती!
कसा सूर्य पाहे हरकून आत्मतेजे!
कसे स्वप्न ताजे घेउन वाहे वारा!

कसे ओल आहे हिरवे धरातल!
कसा डोल आहे लव्हाळिस हरपल!
कसे मौन माझे छेडते क्षण आहे!
जसा खड़का छेडती जलधारा.

जगा वेगळ्या ह्या मनोहर प्रांती,
जगा वेगळा मी येथे एकांती,
जगा वेगळाच मी उतरे तिच्यात,
जसा नको आहे मजला किनारा.

नुरे उगामाचा मोह ह्या मनाला,
नुरे निग़माचा दाहः ह्या मनाला.
हळु गूजते मग नदी मज कानी
"वेडा वेग घेरे मिळत्या उतारा"
...
...
...
एक मी आणि तो नदी किनारा
पुढे पाय माझा तिचा वेग न्यारा...

--भूराम.

रविवार, ६ जुलै, २००८

||अंतरंग||

मी तुला गोठले,
गोठले अंतरंग.
अंतरंग चहुकडे
रक्त रक्त पेटले.

पेटल्या मूठीत मी
आत्ममग्न झाकले.
झाकूनी चहुदिशेस
काळरंग माखले.

माखल्या रात्रीस या
तारकांनी वेढले.
वेढल्या तारकांत
रातराणी बहरली.

बहरुनी फुलाफुलात
वेदना तू हासली.
हासूनी मी ही हळूच
पापणी ही मिटली.

--भूराम.

शनिवार, ५ जुलै, २००८

परिभाष चांदण्यांचे




परिभाष चांदण्यांचे सुरेख गीत झाले,
तू चाहुलीस आला आणि निमित्त झाले.
शब्दाहूनी निराळे आयुष्य पाहीले मी
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

हां भास की म्हणावा हृदयात सांडलेला,
देहातला परंतू की रास मांडलेला,
जे ही रूप तुझे मजला पसंत झाले,
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

तो बोल कधी, पायात रुणझुणणारा,
कधी तो मत्त मदनी, हृदयात लुडबुडणारा,
हे बोल उधळलेले आता अनंत झाले!
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

दिक्कात शोधतो रे, मी अर्थ लागलेले,
सभोव कल्लोळात, अन् मौन सांधलेले!
अर्थात गावता मी, झाले श्रीमंत झाले!!
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

--भूराम

शुक्रवार, ४ जुलै, २००८

संकर



ओढणाऱ्या क्षणात, आठवणींचा स्मर,
जणू चांदणीच्या ओठावर आभाळाचा थर.
ऊर मोजत्या स्पंदनांना जाणवावे विश्व,
असल्या विश्वाशीच माझा घडतो संकर.

ओझे पाऊलांशी होते अन् थकलेले माथे ,
ऊन सावूलींशी जणू रोज गायी प्रेमगीते.
मुक्त चाहुल मनाची या जाणवावी कुणा,
पुढे काय ? काय पुढे? शंका घेतसे आकार.


किती भोवती कावळे अन् झाड़ पिंपळाचे,
पाठी गाठोडे बांधले, त्या गेलेल्या काळाचे.
वारा, झुळुक ही येता, सुरु होते सळसळ,
अन् गाठोडे खोलीता होती कावळे तयार.

अशा विश्वाशीच आता माझा घडतो संकर,
माझ्या कळत्या उराशी कुठे फुटतो अंकुर.
मज फेकूदे गाठोडे अन् ओरडू दे रे फार,
विश्वांस या कळू दे , अन् होवू दे स्वीकार.

--भूराम.

बुधवार, २ जुलै, २००८

भास

आता तरी कळू दे ,
तुझेच भास सारे,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे.

तो रंग शारदेचा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे.

कोणास काय सांगू
मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे..

आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे.

-भूराम.

शुक्रवार, २७ जून, २००८

पावुले मोजीत जा...


पावुले मोजीत जा एकटा क्षितिजाकडे,
सावलीत आपुल्या पेरीत ऊन कोवळे.

तू चालतो दिशा जरी, न चालताच थांबतो.
थांबत्या त्या क्षणांना नकोच घालू साकडे.

'सुख-दुखः' ही कालची आणि आठवांचे बोचके,
नकोस छेडू पुन्हा ही उन्मत्त अवली माकडे.

जे थांबले मागे... तुझे न, राहिले येतील ते,
गेले पुढे , जाऊ दे ती,... आपलीच बापडे.

कोण आहे मात्र तुझा, कोण किती स्वार्थी रे.
का उगाच गुंतवावे प्रश्नांमधे आकडे?

तुझ्यासवे चालती शब्द सूत्र आजची
नको उगाच ठोठावू ती उद्याची कावडे.

भीड़ता कुणी,... भीडावे, अड़ता तू तोड़ रे.
मार्गस्थ हो तू उषेचा, दुर्लक्षूनी जखमांकडे.

पावुले मोजीत जा एकटा क्षितिजाकडे...
सावलीत आपुल्या पेरीत ऊन कोवळे.

---भूराम

बुधवार, २५ जून, २००८

आज येशील ना सखे


आज आभाळ सावळे
माझा गुंतलेला श्वास
क्षणे दिठिच्या कडेला
होई पावसाचा भास.

आज पावलांची होते
कशी रवारव निळी.
त्याच्या दबक्यापणाला
तुझ्या वाटेची गं आस.

किती दिस झाले सखे
नाही भेटला पाऊस,
तुझ्या मीठीमधे माझा
नाही भीजला पाऊस.

किती दिस झाले सखे
नाही भीजला गं वारा
देह दिशांचा करून
नाही कोराला गं तारा.

आज येशील ना सखे
स्वप्न सुखाचे घेवून.
येता थेंब सरी संगे
आण मृदूगंध ख़ास.

--भूराम

खुळ

photograph by Surendra Mahajan.
ईश्वर ईश्वर कोण तो ईश्वर? ईश्वरतेचा वाद का?
जन्मले माणूस तुम्ही , माणुसकीची दाद दया.

धर्म धर्म कोण तो धर्म? धर्मांमधे भांडणे!
जगा आणि जगू दया, हेच तुम्हाला सांगणे.

जातीपाती, कोणती माती? कशी त्यातली श्रेष्ठता!
जन्मले योनितून सारेच, न कळे प्रश्नातील मुर्खता!

स्त्री पुरूष करता तुम्ही, कोण वरचढ मानता?
एकमेकास पूरक दोन्ही,नाही कसे हे जाणता!

'मी-माझा' अहंकार तो, 'अहं' सारयांचे मुळ ते,
लिंग, जात, धर्म, आणि देव अहंकाराचेच खुळ ते.

-भूराम

शुक्रवार, २० जून, २००८

काव्यतेचा शोध...



कोण तो कोठे तो आहे, एकटा क्षितिजाताला!
काय तो शोधून पाही, भाव ह्या हृदयातला!
सांधणे जगण्यास माझ्या, जाणिवा शोकातली,
रोज मी तोडून पाही स्वार्थ ह्या जीवनातला.

प्राण कंठातून येता भान देतो आजचे.
अन् जगां ठावूक आहे काय माझ्या काजचे!
रंग रंग बांधलेले,... यौवनेही गांजली,
शोध तो घेतोच आहे, 'भावत्या' हृदयातला!

मी जरासा शांत झालो, शांतता ही गोठली.
मी मनी आकांत केला, अन् आसवेच दाटली.
शब्द मी मोजून घेई, मोजतोय अर्थही.
भाव तो आसक्त आहे, काव्य शोधण्यातला.

--भूराम

श्री चंद्रकांत गोखले यांना श्रद्धांजली!!


वाचलं आणि त्यांचा पुरूष ह्या नाटकातील मास्तर डोळ्यांसमोर येऊन गेला. डोळ्यातले भावः आणि सुरकुत्यातल्या वेदना मनाला भिडून गेल्या.
माझी त्यांना ही भावपूर्ण श्रध्दांजलि...
========================
आज तो आहे इथे, आज तो नाही इथे,
साऊलीतील चालली आठवणींची गीते.
कोणत्या शब्दातली भावना मी ओळखू?
ओळखीच्या वास्तवास आज तो गेला तिथे.
मौन झाली चांदणे मोजता सुखातली,
पाऊलास ढेचते वेदना नखातली.
माणसास अत्तरून सोडूनी गेला कथे!
ओळखीच्या वास्तवास आज तो गेला तिथे
भ्रम उद्याचा साकारुन जिंकलेला आज तो.
कापलेल्या शब्दातून ऊराऊरात गाजतो.
उभारले नाट्य हे, अन्... आज तो नाही इथे!
ओळखीच्या वास्तवास का असा गेला तिथे?
--भूराम

बुधवार, १८ जून, २००८

प्रश्न (एक चारोळी/तिरळा )


'कर्णं व्हावं की अर्जून?' सारखाच प्रश्न पडतो.

कर्णं घडविणारा सूर्य नेहमी समोर असतो.

अर्जून जिंकविणारा कृष्ण कधी कधीच दिसतो!




--भूराम

मंगळवार, १७ जून, २००८

बेकार... (एक दिनचर्या)

संध्याकाळ सारी मित्रांसंगे
गप्पा गप्पात सरून जाते.
रात्र सारी स्वप्नांमधे
सजून धजून विझून जाते.
सकाळ ताज़ी वर्त्तमानपत्रात
भविष्य शोधून थकून जाते.
दुपार मात्र पायात पेटून
संध्याकाळची वाट पहाते.
संध्याकाळची वाट पहाते...

--भूराम.









Photograph by: Rajkumar Narkhede

रविवार, १५ जून, २००८

...मिलन...


नीळे आभाळ दिठीत, तुझ्या चंदनी मिठीत,

उरे धडधडे गीत, ओठे उष्टावली.


तृप्त आगर सुखाचे, नख त्याला न दुखाचे,

मन सधन पंखांचे, जन्मे ओलांडली.


न्हातो पाऊस सरींचा, गार वारा लहरींचा,

देह वितळे मेणाचा, हरवले स्वत्व.


तुटे जग माया बंध, नाही सभोवाचा गंध,

लख्ख आनंद आनंद, उजविला भगवंत.


कैसे तन्मये हे ध्यान, आत्मे आत्मा एकलिन,

दृढ योगया जे कठिण, आम्ही साधीयेले.

--भूराम.

तुटलेले बिंदू






सिकोया नेशनल पार्क(कैलिफोर्निया) गेलो असतांना, तेथे क्रिस्टल केव्ह च्या बाजूला एक छोटासा धबधबा(/झरा) आहे. त्या खाली उभे राहिलो आणि वर पाहिलं. कोसळणारया पाण्यातून थेंब तुटून पडल्या सारखी दिसत होती तेव्हा सुचलेली ही कविता.



photograph by Surendra Mahajan.

तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते,
स्वच्छ, शुभ्र, आनंदी, गायी गीत झुळझुळते.
सभोवतीचे विश्व जणू स्तब्ध धुंद गाण्यात,
वाहवा ही दाद की पक्षांचे किलबिलते!

खडकांच्या झोळीत क्षण रोमांची थरथर.
किरणांच्या स्पर्शानी सप्तरंगी क्षणभर.
क्षण हिरव्या इर्षेने पालवीवर ढुक धरते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

तान नीळी उधळावी क्षितिजाच्या ओढीत,
स्पर्शे वारा झगडावी कधी लाडीक छेडीत.
काय अदा अहाहा ही जणू उरात धडधड़ते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

स्वछंदी भाव जणू मिलनाची हाव नसे,
साथी जे छेडू तया पूढचाच मार्ग असे.
'अडथळ्यात सौदर्य', मन माझे बघ म्हणते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

--भूराम.

शनिवार, १४ जून, २००८

प्रयत्नच सांगतात...

प्रयत्नच सांगतात कुणास किती गती,
बसून बोलणारयाना फक्त बोलण्यां इतकीच मती.
भिऊ नकोस अंधाराला, काही अंधार तुला खात नाही.
कारण थांबणारयांनाच असते अंधाराची भिती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

तू पाऊस घेऊन आलस तर भीजत नाचतील मुलं.
तसाच निघून गेलास तर तुलाच कोसतील मूलं.
जगाची हया इथल्या अशीच असते नीती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

म्हणून माझं तुला एकच आहे सांगणं,
न थांबता तू सतत प्रयत्न करणं.
मग तुला अडविण्याची कुणा होईल छाती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

--भुराम.

इतकं माझं वय नाही...

मी तुला आयुष्य देतोय, मागण्याची सवय नाही.
जगण्यावरती प्रेम करावं इतकं माझं वय नाही.

पोटात माझ्या दुखु लागतं कुणी मला देता काही,
बोटांवर मग मोजू लागतो किती कर्ज डोकी होई.

तुझं माझं करण्या इतपत शहाणपण मला आलं नाही.
म्हणता कुणी हे माझच चटकन त्याला देता होई.

तूही म्हणतेस असं करता जिवंत राहता येणार नाही,
गरीबांच्या या जगात श्रीमंत होता येणार नाही.

तू जे म्हणतेस असेल खरही पण मला त्याचं भय नाही,
कारण... जगण्यावरती प्रेम करावं इतकं माझं वय नाही.

--भूराम

माणुस् कळू दे...

मज् मिळू दे मिळू दे, नवे आभाळ मिळू दे.
मी जन्मलो माणूस्, मज् माणुस् कळू दे.

देह अनावर होतो ह्या भुलाव्यात खरं,
ह्या भुलाव्याचा आता मज आकार कळू दे.

मी चालतो जी वाट मज आहे अनोळखी,
ह्या वाटेलाच आता मी कोण ते कळू दे.

का पिसाट मी होतो इथे तिथे नको तिथे.
याच पिसाटपणाने ध्येय दिशेला वळू दे.

जिथे मिळतो ओलावा, तिथे अंकुरालो मी,
या अंकुराला आता पूर्ण वृक्षात घडू दे.

मी माणुसच याची कर्मच देतील साक्ष,
या साथीने देहाला नव्या कक्षेत ढळू दे.

अंती रडू दे रडू दे साऱ्या जगाला रडू दे,
मज मृत्युने गाठता उभे आभाळ गळू दे.

मज् मिळू दे मिळू दे, नवे आभाळ मिळू दे.
मी जन्मलो माणूस्, मज् माणुस् कळू दे.
--भुराम

मी एक गुन्हा केलाय...

मी एक गुन्हा केलाय, तू सुध्दा करशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील.

प्रेम या शब्दाला तू ओठांवरती तोलू नको.
मला नाहि जमणार काही अशी मुर्खासारखी बोलू नको.

सारं काही जमेल तूला एकदा प्रेम तरी कर.
प्रेमाचा तो पळभर् ओला श्वास तरी धर.

मग कळेल् तुल ते ह्रदय काय् असतं.
ह्रदयाचं ते विषम धडधडणं काय असतं.

मग कळेल् तूला ते रडणं काय् असतं.
रात्री चन्द्राशी एकटं बड्बडणं काय असतं.

मग मी जे बोललो ते तू सुध्दा बोलशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील...


---भूराम.

बुधवार, ११ जून, २००८

... पाऊस-गीता ...


ह्या इथलं आभाळ सांग कसं होतं,
पाऊस घेऊन दाटलेलं की ठिकठिकाणी फाटलेलं?
जमलेल्या चांदण्यांना कवेत घेऊन
अनेक बरया वाईट आठवनींच कोसळण्यासाठी गोठलेलं?
कुठं भेगा होत्या, कुठं चीरा होत्या,
कुठं वेदना वाहून नेणारया स्पष्ट दिसणारया शीरा होत्या.
प्रेम झुळकीच्या ओढीने डोळ्यांगत व्याकुळलेलं!...
सांग इथलं आभाळ कसं होतं?...


तुला काय ठाऊक म्हणा!...
चांदण्यांच्या प्रकाशाने दीपून जाणारी तू,
स्वप्नांच्या कोषातच पाऊस झेलणारी तू.
ओंजळभर थेंबांनी श्रीमंत होणारी तू.
आठवणींच्या जगात अगदी सहज वावरणारी तू!
तुला काय माहित म्हणा!...
इथलं आभाळ ते कसं होतं?


ती म्हणाली...
आभाळाचं काय घेऊन बसलास चांदण्यांकडे बघ.
गडगडणारया ढगां पेक्षा चमचमणारया जगाकडे बघ.
आनंद कसा शोधावा मग तो कसा जगावा ते माझ्याकडून शिक.
ओंजळभर का असेना ते मला गावलेलं होतं.
माझ्या हक्काचं हे जीवन मला पावलेलं होतं.
शंकेचं ते काळभोर, ठिकठीकाणी कुरतडलेलं तुझं आभळं ज़रा फुंकून बघ.
भेगा,चीरा आणि क्षीरा बघणारे तुझे डोळे ज़रा पूसून बघ.
गोठलेलं ते तुझं आठवणीनंच जग बघ मग कसं बरसू लागतं!
त्याच्या निळ्याशार श्रीमंत थेंबांनी बघ कसं हसू लागतं!


तिची पाऊस-गीता बरसतच होती,
आणि मी ही चिंब झालो होतो
हिरव्यागार आठवाणीत सहझ वावरत!...

---भूराम

मंगळवार, १० जून, २००८

माणूस म्हणून जगण्यासाठी...


माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.

माणसा माणसातील दुरावा मोजून मोजून चालत रहा.

आज काही उदया काही , बोलतो काय करतो काही,

चालण्या बोलण्यातील संबंध पुन्हा पुन्हा शोधत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी...


सुख दुख्खांचा खेळ जीवनामधे चालूच असतो,

उजेड अंधाराचा मेळ प्रत्येक माणूस खालतच असतो.

अंधारातही हसण्यासाठी झोपड्यांमधे शिरत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.


एक थेँब पावसाचा, तो एक थेँब घामाचा,

एक थेंब आसवाचा, तो एक थेँब रक्ताचा.

प्रत्येक थेंबात एकेक करत, कळत नकळत भिजत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.

-भूराम...

तो पाऊस


तो पाऊस मला कालच भेटला, अंगावरून निथळतांना,
म्हणतो आज न आली मजा, एकटं तुला भीझवतांना.

मी मग मुकाच झालो, पापण्या आताच पाणावल्या,
तू असावी जवळ अशाच काही खुनावल्या.

तू आहे तिथे सुखी रहा, आहे तशी सुखिच रहा.
आपल्या प्रेमाबद्दल मात्र जगामध्ये मुकिच रहा.

मीही आता मुकाच असतो ती भिंत मात्र बोलत होती,
त्यावर कोरलेली नावं दोन राझ आपलं खोलत होती.

भिऊ नकोस आता तीही दिसणार नाहीत,कारण त्यावर शेवाळ आलय.
पाऊसाने हे एकच काम न बोलता केलय...
पाऊसाने हे एकच काम न बोलता केलय...



---भूराम.