रविवार, ९ मार्च, २०१४

गारपीट

तोडला पाऊस ज्यांनी ओल त्यांना मागू नका.
चेहरा रक्ताळला ह्या पागलांना सांगू नका.

गोंदलेला घाव आहे फेकलेला ना डाव हा.
काळजा ह्या जाळणारे रक्त आता दाबू नका.

‘आसवांचे षंढ होणे संचितांचे ह्या भोग हे!’
मूर्ख बाता ह्या तयांच्या भोग त्यांचे भोगू नका.

जानवे त्यांचीच जी ती फास होती जाणून घ्या.
सांत्वनांच्या आहुतींची राख झाली चाखू नका.

पोळला तो सूर्य होता, चांद ही आहे पोळला. 
भाबड्या आशेत आता रात्र सारी जागू नका.

-भूराम

३/९/२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा