सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

*** बोललोच नाही ***

"बोलता न आले म्हणूनी बोललो न काही
जगणार्या स्पंदा खातर थांबलो स्वतःही
चांदणे नभाशी येते चंद्र नित्य नाही
ओघळत्या थेंबा खातर भांडली व्यथाही"

पाखरा तू गातो का रे तेच गीत माझे !
फडफडत्या पंखामधले एक पीस ओझे
गरगरते वाऱ्या संगे दूर दूर नेई
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

प्राण खुणांचा हा सारा मोह जाळ होता
विझलेल्या दिवट्यांचा धूर फार होता
दिसले जे बिंब माझे मला निट नाही
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

जे घडते ते घडते, वृथा शोक त्याचा
आकाशी गडगडते का शोध पावसाचा?
वाटे ना कसलेही, कसलेssच नाही.
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

काय कुणा बोलावे मी, बोलणे न आता
गुणगुणता हलकेही डोलतो हा माथा!
कसले हे सत्य आहे, नित्य जे प्रवाही
बोलता न आले म्हणूनी बोललोच नाही

-भूराम
११/१२/२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा